महाराष्ट्र

“संविधानाच्या दीपस्तंभाखाली… अमरावतीत उद्देशिकेचा सामूहिक स्वर घुमला”

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती:

भारतीय लोकशाहीच्या शाश्वत मूल्यांना उजाळा देणारा, जनजागृतीचा दीप पेटवणारा संविधान दिन आज अमरावतीत अभूतपूर्व ऐश्वर्याने साजरा झाला. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांसह जिल्हाधिकारी कार्यालयातून आणि शहराच्या मध्यवर्ती इर्विन चौकातून संविधानाच्या उद्देशिकेचा सामूहिक स्वर दुमदुमला… नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे भान देणारा हा स्वर आज अधिक निर्धाराने आणि सामूहिक निष्ठेने उच्चारला गेला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे उद्देशिकेचे वाचन करून संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधीक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

इर्विन चौकात तर वातावरण अधिकच प्रेरणादायी होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत संविधानातील आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला.

यावेळी श्री. येरेकर म्हणाले, “भारताचे संविधान हा आपल्या राष्ट्राचा अढळ पाया आहे. या संविधानाने नागरिकांना हक्कांची ताकद दिली आणि कर्तव्यांची जाणही दिली. याच संतुलनामुळे राष्ट्र प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहे. समतेच्या मुल्यांमुळे भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.”

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार टिना चव्हाण यांच्यासह प्रशासनातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संविधानाच्या शब्दांना आज पुन्हा जिवंत करणारा, लोकशाहीच्या जडणघडणीतील प्रत्येक नागरिकाची भूमिका अधोरेखित करणारा हा दिवस, अमरावतीच्या स्मरणात दीर्घकाळ कोरला जाईल…

Back to top button