अजित पवारांना या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचे ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर तसेच पुत्र पार्थ पवार याच्या कार्यालयावर आणि कंपनीवर सुद्धा आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं धक्कादायक विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रामदास आठवले यांच्या हस्ते एका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माध्यमंही संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. ईडी, सीबीआय आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर पडलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.
तसेच पुढे बोलताना आठवले म्हणाले की, या यंत्रणांनी ५ दिवस छापेमारी करण्याऐवजी कारवाई लवकर करावी, असं मतही त्यांनी व्यक्त केले. आर्यन खानवर NCB ने केलेली कारवाई योग्य असून नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले. फिल्म इंडस्ट्रीमध्येच जास्त ड्रग्सचा वापर होतो असं सांगतानाच फिल्म इंडस्ट्री स्वच्छ असावी असंही ते म्हणाले.