तर आपण संविधानाचं एक पानही आज लिहू शकलो असतो का?
नवी दिल्ली | आज 26 नोव्हेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा करून संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानप्रती आदर व्यक्त केला जातो. संविधान दिनानिमित्त आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच संविधानाचं महत्त्व बोलून दाखवलं आहे.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज जर आपल्याला संविधान लिहायला लागलं असतं तर काय झालं असतं? स्वातंत्र्य आंदोलनाची छाया, देशभक्तिची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहीत सर्वोच्च हाच मंत्र होता. विविधतेनं नटलेला देश, अनेक भाषा, पंथ असं सर्व असतानाही देशाला एकाच बंधनात अडकवून ठेवणं कठीणं होतं’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ‘आज जर मागे वळून पाहिलं तर आपण संविधानाचं एक पानतरी लिहू शकलो असतो का? असा प्रश्न पडतो,’असं म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी यावेळी एक खंत देखील व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘त्यावेळी राष्ट्र पहिलं होतं. परतुं काळानुसार राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे देशहित मागे पडू लागले आहे,’अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.