वानखडे-मलिक वादात आता मनसेची उडी, तर हे आरोप आम्ही खपवून घेणार नाही

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप लगावले होते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळं राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतलेली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीची कारवाई ही बाॅलिवूडला बदनाम करण्यासाठी केली आहे, असा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात जास्मीन वानखेडेवर जोरदार आरोप केले होते. जास्मीन वानखेडे आणि समीर वानखेडे यांनी बाॅलिवूडमधील कलाकारांकडून दुबईत जाऊन वसूली केल्याचा गंभीर आरोप केला होता. हे सर्व आरोप जास्मीन वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.
जास्मीन वानखेडे या मनसेच्या पदाधिकारी आहेत. मनसे नेते अमेय खोपकर यांनी जास्मीन वानखेडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांवर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.



