सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू केलेले वस्तीगृह गरजेचे होते-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू केलेले वस्तीगृह गरजेचे होते-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.30(प्रतिनिधी)ः- सध्याची परिस्थिती पाहता मुलींना शिक्षण घेत असताना समृद्ध वारसा जपत संस्काराची शिदोरी देखील महत्त्वाची राहिली आहे. आपल्या मुलाची सुरक्षितता असावी अशी अपेक्षा पालकांची असतेच त्याचबरोबर व्यावसायिक उपक्रम म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून मुलींसाठी सुरक्षित वस्तीगृह आवश्यक होते असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड येथील शाहूनगर भागात प्रा.उमाकांत जगताप यांनी व्यंकटेश गर्ल हॉस्टेल उभारणी केली आहे. या हॉस्टेलचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प.माऊली महाराज जगताप, प्रा.श्रीराम चौभारे, डॉ.चैतन्य कागदे, डॉ.आत्माराम गंगणे, डॉ.प्रशांत गायकवाड, जयंत जाधव, डॉ.तुकाराम बडे, अशोक पवार, डॉ.मंचक जाधव, पंजाबराव मस्के, अॅड.शहाजीराव जगताप, दिलीप घुमरे, प्रा.सत्येंद्र पाटील, प्रा नामदेव चांगण, प्रा.पी.आर.बोबडे, बबनराव उडाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, बाहेरगावी शिक्षण घेणार्या मुलींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी पालकांचा आग्रह असतो. प्रत्येक पालक हा आपल्या पाल्याची सुरक्षितता बघतो या ठिकाणी सुरक्षिततेबरोबर सामाजिक सुरक्षितता ही किती महत्त्वाची आहे हे महत्त्वाचे असते. या ठिकाणी व्यावसायिक उपक्रम म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून मुलींसाठी सुरक्षित वस्तीगृह उभारले असले तरी हे एक आव्हानच आहे. मानसिक आणि भावनिक जडणघडण भौतिक सुविधा सामाजिक सुरक्षा संरक्षण आरोग्य अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अद्यावत वस्तीगृह असणे गरजेचे होते. मुलींना शिक्षण घेताना स्वतःची सुरक्षितता मिळावी तसेच सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात असा आग्रह असतो. सध्या स्त्री आणि पुरुष असा भेदभाव राहिला नसून समानतेच्या आधारावर सध्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षण सुरू आहे. आपल्या संस्काराची प्रथा प्रत्येकाला समजावी आपला समृद्ध वारसा जपला पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या माणुसकीला काळीमा फासणार्या घटना घडत असून त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन सामाजिक कार्याचा गाडा पुढे न्यायला हवा असे ते म्हणाले, यावेळी मोहनराव सोळूंके, अनंत पिंपळे, सुरज घुमरे, डॉ.हनुमंत जगताप, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर, महिला-पुरूषांची उपस्थिती होती.



