महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या ध्वजांची काळजी घ्या! ध्वजांची अवहेलना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे – डॉ. गणेश ढवळे

ध्वजांची अवहेलना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि. १०):महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या उपक्रमांची सजावट म्हणून सार्वजनिक ठिकाणी चौकाचौकात, रस्त्यांवर, लोखंडी दुभाजकांवर व पथदिव्यांच्या खांबांवर विविध ध्वज लावले जातात.
मात्र, या ध्वजांची योग्य देखभाल न झाल्याने ते फाटतात, जीर्ण होतात आणि काही वेळा पायदळी तुडवलेही जातात. यामुळे त्या ध्वजांचे प्रतीकात्मक महत्त्व कमी होते, तसेच सामाजिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होतात. ध्वजांची विटंबना ही कायद्याचे उल्लंघन मानली जाते आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, “ध्वज म्हणजे महापुरुषांच्या अस्मितेचे, त्यागाचे, बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांची अवहेलना होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.”
पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी – ठोस मागणी
जयंती कार्यक्रमासाठी पोलिस परवानगी आवश्यक असतेच. त्यामुळेच पोलिस प्रशासनाने प्रत्येक सार्वजनिक उत्सव समितीला ध्वज व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करताना लेखी सूचना द्याव्यात, असेही डॉ. ढवळे यांनी सांगितले.
तसेच जयंतीनंतर ठराविक कालावधीनंतर जीर्ण, फाटलेले, खालवर पडलेले वा दुर्लक्षित ध्वज तातडीने काढून घेण्याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली



