📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिव्हाळा बेघर निवारासाठी नगरपरिषद सी.ओ. समवेत बीड शहर बचाव मंचाची बैठक

जिव्हाळा बेघर निवारासाठी नगरपरिषद सी.ओ. समवेत बीड शहर बचाव मंचाची बैठक
** कृष्णाई नगर, आगलावे इस्टेट भागातील पिण्याच्या पाण्याचा व पथदिव्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी
** माने कॉम्प्लेक्स समोरील चौकाला महात्मा गांधी चौक व रस्त्याला महात्मा गांधी मार्ग नाव देण्याची आग्रही मागणी

बीड प्रतिनिधी  दि. 9/09 :  बीड शहरातील नवी भाजी मंडई भागातील सातत्याने कार्यरत असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रासाठी शासन निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी बीड शहर बचाव मंचाच्या  शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बैठक केली. या बैठकीमध्ये शासनाच्या जीआर सह  निवेदन सादर करण्यात आले. जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला अद्यापही शासन निधी मिळत नसल्याचे यातून निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कसल्याही प्रकारची मदत कार्य उपाययोजना मिळत नसल्याचेही सांगण्यात आले. आपल्या नगर परिषदे तर्फे कसल्याही सोयी सुविधा व गरजे नुसार मदत कार्य तिथे केल्या जात नाही हे पण निदर्शनास आणून देण्यात आले. यावर मुख्याधिकारी साहेबांनी सकारात्मकतेने सविस्तर पणे परिस्थितीचा आढावा घेत योग्य ती चर्चा करून मार्गदर्शन केले. बेघर निवारा केंद्रासाठी नगरपरिषदे कडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आमसभे मध्ये ठराव मांडण्यात येईल यासाठी तात्काळ कार्यवाहीला सुरुवात केली आहे. तसेच जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील सद्य परिस्थितीतील सर्व समस्यांची यादी करून घेतली आहे. अशा पद्धतीने मुख्याधिकारी  विवेक मांडुरके साहेब यांनी सकारात्मकपणे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी आश्वासित केले आहे.
याच बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड शहर बचाव मंच शिष्टमंडळाच्या वतीने अंकुश नगरला जोडलेल्या भागातील कृष्णाई नगर, आगलावे इस्टेट या सर्व परिसरामधील  पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच पाईपलाईन दुरुस्ती, नळ कनेक्शन दुरुस्त्या तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे प्रश्न मांडण्यात आले. या भागांमध्ये पथदिवे अद्यापही लावण्यात आलेले नाहीत हेही निदर्शनास आणून दिले. पथदिव्यां अभावी अंधारामुळे नागरिकांची सातत्याने होत असलेली गैरसोय  निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. यासंदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी यांनी उपस्थितांना आश्वासित केले आहे. बैठकीच्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाच्या वतीने ‘माने कॉम्प्लेक्स’ समोरील चौकाला महात्मा गांधी चौक असे नाव देण्यात यावे व या मार्गांना महात्मा गांधी मार्ग असे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर निवेदन मुख्याधिकारी  यांना सादर करण्यात आले आहे. या सर्व प्रश्नांसाठी तसेच मागण्यांसाठी दिलेल्या निवेदनांवर योग्य ती कार्यवाही करून उपयोजना केल्या जातील असे सकारात्मकपणे आश्वासित केले आहे. यावेळी शिष्टमंडळामध्ये बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये, प्राचार्य कॉ. डी.जी तांदळे , डॉ. संजय तांदळे, पाशाभाई शेख, बाजीराव ढाकणे, जिव्हाळाचे राजू वंजारे, अभिजीत वैद्य आदी सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button