जिथे शब्दांना सूर लाभतात – तिथे सौदागर पुरस्काराने उजळतात!

जिथे शब्दांना सूर लाभतात – तिथे सौदागर पुरस्काराने उजळतात!
सुप्रसिद्ध निसर्गकवी बाबासाहेब सौदागर यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्कार जाहीर
विशेष बातमी ( धनराज पवार) :- श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार आणि निसर्गकवी बाबासाहेब सौदागर यांना यंदाचा राज्यस्तरीय गिरणा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
बाबासाहेब सौदागर यांनी शंभरहून अधिक मराठी चित्रपटांसाठी तसेच सत्तावीस मालिकांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन झाले असून सांजगंध, पिवळण, चित्र रंग, भंडारभुल, पायपोळ, मृग पक्षी, भेद्रपान ही त्यांची विशेषतः लोकप्रिय ठरलेली पुस्तके आहेत.
त्यांच्या कवितांना आणि गीतांना आशा भोसले, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, देवकी पंडित, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, नंदेश उमाप, अनुराधा पौडवाल, रविंद्र साठे, कैलास खेर, शान, रुपकुमार राठोड, सुखविंदर सिंग, वैशाली माडे, अनुराधा मराठे यांसारख्या दिग्गज गायक-गायिकांनी स्वरबद्ध केले आहे.
साहित्यक्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेत, दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कालिदास नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या निवडीमुळे आहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यिक क्षेत्रात आनंदाची लहर उमटली आहे.



