बीड
आचारसंहितेआड प्रशासनाचा विलंब – पांडुरंग माने

आचारसंहितेआड प्रशासनाचा विलंब – पांडुरंग माने
उपोषणामुळे नामकरणाचा मुद्दा चर्चेत
जामखेड प्रतिनिधी : जामखेड नगर परिषद नामकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसून आले.
महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समिती सदस्य तथा
उपोषणकर्ते पांडुरंग माने यांनी नगर परिषद प्रशासन, सत्ताधारी पदाधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माने म्हणाले,नगर परिषद सत्ताधारी, नगराध्यक्षा आणि प्रशासन अजूनही सुस्त आहे. माता अहिल्यादेवींच्या नावासाठी एवढी उपेक्षा का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मतदार संघातील अनेक विकास कामांना तत्वतः मान्यता मिळते परंतु जामखेड नगर परिषदेच्या नामकरणास तत्वतः मान्यता मिळत नाही.आचारसंहितेचे कारण पुढे करत विषय जाणीवपूर्वक रखडवला जात आहे.असा आरोप करत, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी माने यांनी केली.आश्वासन नको तर कागदोपत्री मान्यता व प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, असेही माने यांनी स्पष्ट केले.
या उपोषणामुळे जामखेड शहरातील राजकीय व सामाजिक वातावरणातही चर्चा रंगू लागली आहे. मानेंच्या भूमिकेला राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समर्थन दर्शवले असून, प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



