बीड

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

लिंबागणेश (दि. १०):बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीगुरू ईश्वरबाबा भारती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरूपौर्णिमा उत्सव आज (दि. १०, गुरुवार) मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी संस्थानचे मठाधिपती महंत महादेव भारती महाराज व शांती ब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते भगवान बेलेश्वराच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, तसेच श्रीगुरू ईश्वरबाबा महाराजांच्या समाधीची महापूजा करण्यात आली.

कार्यक्रमात वारकरी मंडळींनी भजनसेवा सादर केली. त्यानंतर महाप्रसादाच्या पंगती पार पडल्या, ज्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. पंचक्रोशीतील भाविकांनी समाधी दर्शन आणि महंतांचे आशिर्वाद घेण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

“गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा”

– शांती ब्रम्ह तुकाराम भारती महाराज**

गुरूपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाणारी ही गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची अनोखी परंपरा आहे.

महर्षी वेदव्यास यांनी मानवजातीस चार वेदांचे ज्ञान दिले. त्यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, म्हणूनच हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणून ओळखला जातो.

हा दिवस केवळ अध्यात्मिकच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे, असे शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांनी आपल्या प्रवचनात सांगितले.

Back to top button