बीड
नाथ षष्ठी निमित्ताने नारायणगड ते पैठण पायी दिंडीचे आयोजन

नाथ षष्ठी निमित्ताने नारायणगड ते पैठण पायी दिंडीचे आयोजन
”भानुदास एकनाथा’चा जयघोष निनाद होणार..
कोळगाव, दि.१५ – महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाला नाथ षष्ठी निमित्त पैठणच्या यात्रेला येण्याची वेध लागले आहे. या नाथ षष्ठी निमित्ताने बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायण गड येथून पंरपरेनूसार नाथ षष्ठी निमित्त पायी दिंडी सोहळा जात असून यंदाच्या वर्षी दि.१६ मार्च रोजी दिंडी पैठण कडे प्रस्थान करणार आहे.
बीड जिल्ह्यातील क्षेत्र नारायणगड संस्थानाच्या वतीने एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी निमित्ताने पायी दिंडी सोहळा गुरू परंपरेनूसार आयोजन केले जाते आहे. यंदाच्या वर्षी फाल्गुन शुद्ध कृष्ण पक्ष ०२ नाथ षष्ठी निमित्ताने नारायणगड ते पैठण पायी दिंडीयात्रेचे आयोजन महंत श्री ह भ प मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. या पायी दिंडीत नारायणगड संस्थानाच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त या सोहळ्यात सहभागी असतात. याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा असून आकर्षक सजावटीच्या रथ, घोडा, वारकरी, टाळकरी, मृदुंगचार्य, गायक भजनाचार्य यांच्या उपस्थितीत या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ मार्च २०२५ रोजी दुपारच्या सुमारास श्री क्षेत्र नारायणगड येथून प्रस्थान करणार एकुण चार मुक्कामाची ही पायी दिंडी सोहळा असून गात शिरापुर, वाटगव्हाण, सायगव्हाण, दि. १९ मार्च रोजी पैठण येथे मुक्कामी आहे. तसेच काल्याचे अमृततुल्य किर्तन झाल्यानंतर दिंडी परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तरी या दिंडी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने केले आहे.
…….. चौकट
वारकरी संप्रदायाची परंपरा खुप प्राचीन – मठाधिपती शिवाजी महाराज
गुरुदेवांची परंपरा वाढवणे आमचे कार्य आहे. यामध्ये धाकटी पंढरी श्री. क्षेत्र नारायण गड येथून गुरुवर्य महंत वै.महादेव महाराज यांनी श्री.क्षेत्र पंढरपूर व श्री क्षेत्र पैठण या दोन्ही ठिकाणी वर्षातून दोन वेळा पायी दिंडी सोहळा काढून पंचक्रोशीतील भाविक भक्तांना एकत्रित करून गुण्या गोविंदाने नांदायची शिकवले. त्याच परंपरेचे आम्ही पाईक म्हणून हा दिंडी सोहळा मोठ्या थाटाने दरवर्षी पैठण कडे घेऊन जात असतो याही वर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत.अशी प्रतिक्रिया मठाधिपती महंत शिवाजी महाराजांनी यांनी दिली आहे.


