३५० आदिवासी समाजाच्या कुटुंबांच्या हक्कासाठी ; तहसील कार्यालयास घेराव

३५० आदिवासी समाजाच्या कुटुंबांच्या हक्कासाठी ; तहसील कार्यालयास घेराव
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्ती वरील आदिवासी भटके विमुक्तांचे अतिक्रमित घरे असणारी गट क्रमांक 52/52 वरील जागा लाभार्थ्यांच्या नावे करण्यासाठी गटविकास अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका शक्ती प्रादत्त समितीची बैठक गुरुवार दि. 12 जून रोजी श्रीगोंदा येथे घेण्यात येणार आहे. तसेच भटके विमुक्तांच्या जातीच्या दाखल्याबाबत परिपूर्ण प्रस्तावाची छाननी करून उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीने सदर दाखले घेण्यासाठी येत्या १५ दिवसात कॅम्प घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन श्रीगोंद्याचे तहसीलदार मुदगुल यांनी आंदोलन करताना दिले.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील जुना गट नंबर 52/52 तसेच नवीन गट नंबर २/१/५२ या क्षेत्रावर भटके मुक्त समाजाची 1994 पासून अतिक्रमित कच्ची घर पाल व कुडाची घरे आहेत 350 भटके मुक्त कुटुंब राहतात त्यापैकी 35 कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत परंतु सदर लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी ते वास्तविक करीत असलेली जागा अतिक्रमण नियमनाकुल करून मिळावी यासाठी 16 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा यांच्याशी चर्चा करून शक्ती प्रदक समितीची बैठक बोलवावी व या बेघर कुटुंबांना जमीन हस्तांतरित करावी.
तसेच श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने श्रीगोंदाचे तहसीलदार मुगदुल यांना आदिवासी समाजातील महिला आदिवासी भटके मुक्त समाजातील महिलांनी घेराव घालून आंदोलन केले. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो असे लेखी आश्वासन दिले.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास भटक्या विमुक्त संयोजन समितीच्या सदस्या लता सावंत, पल्लवी शेलार, उमाताई जाधव, बापू ओहोळ, तुकाराम पवार, विशाल पवार, आसाराम काळे, संतोष चव्हाण, राहुल पवार, सचिन चव्हाण, आतिश पारवे, राजू शिंदे, ललिता पवार, रेशमा बागवान, शितल काळे, काजोरी पवार, डीसेना पवार, ऋषिकेश पवार, ऋषिकेश गायकवाड, अशोक मोरे, राजू भोसले, सागर शिंदे, संतोष पवार, मच्छिंद्र जाधव, राजू शिंदे, अविनाश काळे, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह आदिवासी भटके विमुक्त समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
भटके विमुक्त समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या आंदोलनास शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे, तालुकाप्रमुख नंदू गाडे त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट उपस्थित होते.
सकाळी 11:00 वाजल्यापासूनच श्रीगोंदा येथील शेख महंमद महाराज मंदिरापासून ढोल, ताशा, संबळ, हलगी, डफ, तुणतुणे अशा भटक्या व्यक्तांच्या पारंपारिक वाद्यासह वाजत गाजत आंदोलन करते पोलीस स्टेशन मार्गे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचले. तेथे आदिवासी भटके मुक्तांनी पाल ठोको आंदोलन केले.
आवाज दो हम एक है, नया जमाना आयेगा, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जितेंगे, आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, आमच्या हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी आंदोलन करतांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.
आदिवासी भटके मुक्तांच्या संयोजन समितीच्या सदस्य लता सावंत, पारधी विकास कृती समितीचे सदस्य तुकाराम पवार, अनिल घनवट, रूपचंद सावंत, संजय सावंत यांची भाषणे झाली.अरविंद कापसे, मिराबाई शिंदे यांची भाषणे झाली. बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी शेलार यांनी आभार मानले.



