स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान तर्फे 25 वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव

स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान तर्फे 25 वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव
तीर्थक्षेत्र महिमा व चाणक्यनीती’ या कथानिरूपणापासून ३१ डिसेंबरपासून …
बीड (प्रतिनिधी):25 वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव 31 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे संपन्न होणार आहे.
या कीर्तन महोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांचे महत्त्व सांगणाऱ्या संगीतमय कथेतून होणार आहे. ही कथा साध्वी ह.भ.प. वैभवीश्रीजी (श्रीधाम गोकुळ) यांच्या अमृतवाणीने ४ जानेवारीपर्यंत दररोज दोन सत्रांमध्ये सादर केली जाणार आहे.
तसेच दररोज ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत मानवी जीवनात व सामाजिक व कौटुंबिक व्यवहारात वेळोवेळी उपयोगी पडणाऱ्या चाणक्यनीतीवर आधारित कथानिरूपण सादर केले जाणार आहे.
ही कथानिरूपण ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे (सेलू, परभणी) हे दररोज सायंकाळी करणार आहेत.
यानंतर ५ जानेवारीपासून महाराष्ट्रातील ख्यातनाम सांप्रदायिक कीर्तनकारांची आठ (८) भव्य कीर्तने सादर होणार आहेत.
गेल्या २५ वर्षांपासून भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादामुळे संतविचार जनसामान्यांच्या मनावर बिंबविण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. तसेच बीड शहरवासीयांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे व प्रतिसादामुळे हा उपक्रम २५ वर्षे पूर्ण करू शकला आहे .
या अकरा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. त्या तीर्थक्षेत्रांचे धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व सर्वसामान्य वारकरी व भाविक बांधवांना कथांच्या माध्यमातून समजावे, या उद्देशाने ‘तीर्थक्षेत्र महिमा’ सांगणारी कथा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त व संतुलित जीवन कसे जगावे, जीवनात येणाऱ्या अडचणींना शांतचित्ताने सामोरे जाऊन त्यातून मार्ग कसा काढावा, यासाठी चाणक्यनीतीचा आधार घेऊन संगीतमय ‘चाणक्यनीती’ कथानिरूपणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व अभंगद्वारे जनसामान्यांचे प्रबोधन राज्यातील दिग्गज कीर्तनकार आपल्या सखोल निरूपणातून करणार आहेत.
बीड शहरातील सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहावे. या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खटोड प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.



