‘मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेमुळे महाराष्ट्राची प्रकृती बिघडली,
मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. तसेच विविध मुद्दयावरून आघाडीच्या अडचणी वाढवताना एकही संधी न सोडताना दिसून आले आहेत. त्यातच रविवारी महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर या दोन वर्षपूर्तीच्या निमित्ताने विरोधकांकडून तिखट प्रतिक्रीया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी टीका केली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली ; त्यांना लवकर आराम पडो मात्र दोन वर्षांपासून त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा एका चांगल्या Operation (शस्त्रक्रिया) ची गरज आहे. अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
मागच्या काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाणार? याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता प्रभार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.