बीड
‘कोंबडं घ्या, पण जलजीवनचे पाणी द्या’आष्टीत मनसेचे अनोखे आंदोलन

‘कोंबडं घ्या, पण जलजीवनचे पाणी द्या’आष्टीत मनसेचे अनोखे आंदोलन
आष्टी, दि. (७) : आष्टी तालुक्यात जलजीवन मिशनमार्फत नळयोजनांची सुरू असलेली कामे गेल्या चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलजीवनची अर्धवट कामे पूर्ण करून नागरिकांना पाणी मिळावे याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे शेतकरी सेनेचे कैलास दरेकर यांनी सोमवारी (दि. ७) पंचायत समिती कार्यालयात ‘कोंबडं घ्या, पण जलजीवनचे पाणी द्या’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महात्वाकांक्षी योजना आहे. आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या तीन तालुक्यांतील गावांना कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीने होरपळणार्या जनतेला विशेष करून महिला व वयोवृद्ध नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार असून भारत निर्माण योजना, स्वजलधारा योजना, जलस्वराज्य, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल, योजना, प्रधानमंत्री पेयजल योजना यासारख्या विविध योजनांवर शेकडो कोटींचा निधी खर्च होऊनही अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने निकृष्ट कामांमुळे वर्षानुवर्षे डोक्यावर असलेला हंडा उतरण्यास तयार नाही.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यातील 172 गावे, पाटोदा तालुक्यातील 90 गावे व शिरूर तालुक्यातीलही अनेक गावांत ही योजना राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडून प्रत्यक्ष कामांना सुरवातही धुमधडाक्यात करण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदार व अधिकार्यांच्या अभद्र युतीमुळे इतर राबविण्यात आलेल्या योजनांप्रमाणे या योजनेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्यात आले असून गेल्या चार वर्षांपासून जवळपास सर्वच योजना अर्धवट अवस्थेत ठेवून मागील योजनांप्रमाणे या योजनेतही भ्रष्टाचार करण्याचे मनसुबे कंत्राटदार व अधिकार्यांकडून बाळगले जात आहेत.
आष्टी तालुक्यातील 172 पैकी 44 कामे तसेच पाटोदा तालुक्यातील 90 पैकी 27 कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली व पाटोदा तालुक्यातील 5 कामांची यशस्वी चाचणी घेण्यात आली असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपावेतो कोणत्याही गावाला या योजनेमार्फत पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांसाठी कोट्यावधी रूपयांची ही जलजीवन योजना मृगजळच ठरली असल्याचे दिसून येत आहे.
कार्यारंभ आदेशानंतर चार वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप या योजनेमार्फत सुरू असलेली कामे पूर्णत्वास गेलेली नसून मुदतवाढीचे प्रस्ताव थातूरमातूर कारणे दाखवून मोठ्या आर्थिक उलाढालीतून मंजूर करण्यात आलेले आहेत अथवा तशा हालचाली सुरू आहेत.
आष्टी मतदारसंघातील सर्वच कामांमध्ये निविदा प्रकिया राबविण्यापासून मोठ्या प्रमाणावर गोलमाल करण्यात आलेला आहे. एकाच कंत्राटदारांना 20 ते 25 कामे देण्याचा महाप्रताप करण्यात आलेला आहे. अद्यापपावेतो ही योजनाही कागदोपत्रीच सुरू असून याचा नागरिकांना कोणताही लाभ झालेला नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेशामध्ये कंत्राटदारांना घालून देण्यात आलेल्या अटी व शर्तींप्रमाणे कंत्राटदारांवर 10 टक्के दंडात्मक कारवाई करण्यात येणे गरजेचे व आवश्यक आहे.
कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना सहाय्य करणार्या अधिकार्यांवरही फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत. यासह आष्टी तालुक्यातील जनतेला तातडीने जलजीवन योजनेचे पाणी नळाद्वारे मिळावे यासाठी सोमवारी (दि. 7) अनोखे आंदोलन करण्यात आले.
(चौकट)
पोतराजाच्या वेश; अन सुबुळ्याने वेधले लक्ष
———-
दरम्यान, जलजीवन योजनेत आष्टी मतदारसंघात झालेल्या गैरप्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी कैलास दरेकर यांनी पोतराजाचा वेश परिधान करून आष्टी शहरातून हलगी, संबुळं व ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढत पंचायत समितीमध्ये जावून अधिका-यांना आखाड महिन्यातील कोंबड्यांची भेट दिली. या आंदोलनाची चर्चा दिवसभर सुरू होती.
——-
(चौकट)



