बीड

रानवली मध्ये ज्ञानक्रांतीची मुहूर्तमेढ : ग्रामपंचायतीच्या ‘बोलका पार’ उपक्रमाने गावाला दिली नवचैतन्याची दिशा

रानवली मध्ये ज्ञानक्रांतीची मुहूर्तमेढ : ग्रामपंचायतीच्या ‘बोलका पार’ उपक्रमाने गावाला दिली नवचैतन्याची दिशा

श्रीवर्धन(संदेश घोलप): ग्रामीण भागात विकासाच्या चर्चा अनेकदा कागदोपत्रीच राहतात; मात्र रानवली ग्रामपंचायतीने कृतीतून आदर्श निर्माण करत “बोलका पार” हा अभिनव आणि दूरदृष्टीचा उपक्रम साकारला आहे. पारंपरिक पाराला आधुनिक ज्ञानदालनाचे रूप देत ग्रामपंचायतीने वाचन, संवाद आणि जनजागृती यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.
रानवली ग्रामपंचायत कार्यालय शेजारी असलेल्या असलेल्या पारावर आकर्षक आणि माहितीपूर्ण चित्ररचना करण्यात आली असून विविध शासकीय योजनांची माहिती सोप्या भाषेत मांडली आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, डिजिटल व्यवहार, पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांवर आधारित फलकांमुळे पार आता केवळ बैठक ठिकाण न राहता मार्गदर्शक केंद्र ठरला आहे.
या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये म्हणजे मराठी आणि उर्दू वृत्तपत्रांची नियमित व्यवस्था. त्यामुळे गावातील युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना देश-विदेशातील घडामोडींची अद्ययावत माहिती मिळत आहे. सकाळी आणि संध्याकाळी पारावर वाचनासोबतच चालणाऱ्या चर्चांमुळे गावात विचारांची देवाणघेवाण वाढली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले की, “आपला गाव समृद्ध, जागरूक आणि प्रगत व्हावा हा आमचा ध्यास आहे. पारावर बसून केवळ गप्पा न होता, ग्रामस्थांना माहिती मिळावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ‘बोलका पार’ साकारला आहे.”
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्यांनीही या कल्पक संकल्पनेचे कौतुक करत इतर गावांनीही असा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे गावात वाचनसंस्कृतीला नवे बळ मिळाले असून युवकांमध्ये सामाजिक विषयांबद्दल जागरूकता वाढत आहे. ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करत रानवली ग्रामपंचायतीने खऱ्या अर्थाने ज्ञानक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे.
Back to top button