बीड

हरिहरेश्वर ते बाणगंगा, सावरवाडी, साक्षभैरीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था; रुग्ण दगावण्याची भीती

हरिहरेश्वर ते बाणगंगा, सावरवाडी, साक्षभैरीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था; रुग्ण दगावण्याची भीती
​भयंकर चिखलात वाहने पुढे जाण्याऐवजी पाठीमागे सरकत फरफडतेय; जीवघेण्या प्रवासामुळे तीन वाड्यांमधील नागरिक मरणयातनेत!
​श्रीवर्धन (संदेश घोलप) :
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर शेजारील मुख्य रस्त्याची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे. हरिहरेश्वर ते बाणगंगा गावाकडे जाणाऱ्या  रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, हा रस्ता बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या तीन महत्त्वाच्या वाड्यांना जोडणारा एकमेव मुख्य दुवा आहे. पाऊस सुरू होताच हा रस्ता कमालीचा निसरडा, चिखलमय आणि धोकादायक बनला असून, नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “प्रशासकीय निष्काळजीपणामुळे एखाद्या दुचाकीस्वाराचा जीव गेला किंवा एखादा गंभीर रुग्ण दगावला, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मंडळी विचारत आहेत.
​तब्बल १५ वर्षांपासून साधी डागडुजीही नाही!
​धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला आणि बाणगंगा येथील प्रसिद्ध राम मंदिराला जोडणारा हा मुख्य रस्ता पूर्णपणे खचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तब्बल १५ वर्षांत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर सध्या केवळ चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
​सध्याची परिस्थिती इतकी भयंकर झाली आहे की, या रस्त्यावरून साधे वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. चिखलाच्या प्रचंड दलदलीमुळे दुचाकींचे टायर जागच्या जागी वेडेवाकडे घसरत आहेत तर दुसरीकडे, गावात ये-जा करणाऱ्या रिक्षा चिखलामुळे पुढे जाणे अशक्य झाले आहे. रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, ती चिखलावरून घसरत थेट पाठीमागे सरकत फरफडत जात असल्याचे अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले आहे  अशा अत्यंत धोकादायक स्थितीत रिक्षा पलटी होऊन मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या तीन वाड्यांमधील अनेक शाळकरी मुले, नोकरदार आणि वयोवृद्ध नागरिकांना याच चिखलातून रोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
​आरोग्य यंत्रणा कोलमडली; पेशंट घरी आणणेही अशक्य!
​या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील आरोग्य सुविधेचे पार धिंडवडे निघाले आहेत. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा आजारपणात दवाखान्यात पोहोचायचे असल्यास, जे अंतर अवघ्या ५ मिनिटांत पार होणे अपेक्षित आहे, त्यासाठी आता खड्डे आणि चिखल चुकवत २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गंभीर रुग्णावर रुग्णालयात उपचार करून त्याला परत घरी आणायचे असल्यास, खराब रस्त्यामुळे पेशंटला गाडीतून किंवा रिक्षातून घरी आणणेही अशक्य झाले आहे. ऐन वेळेवर रुग्णवाहिका किंवा खासगी वाहने या रस्त्यावरून येण्यास साफ नकार देत असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
​नेतेमंडळींकडून फक्त आश्वासनांची खैरात!
​”हा रस्ता तीन वाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या दुरवस्थेने रोज अपघात होत आहेत, चिखलामुळे साधी रिक्षाही पुढे जाऊ शकत नाही, ती पाठीमागे घसरत फरफडत जातेय नेतेमंडळींकडून आजवर फक्त पोकळ आश्वासने दिली गेली, पण काम होताना दिसत नाही.”
–संकेत हुमणे, स्थानिक नागरिक
​प्रशासनाचा ढिसाळ कारभार; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
पाऊस सक्रिय झालेला असताना केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर काम कधी सुरू होणार? असा रोकडा सवाल नागरिक व मनसे विचारत आहेत. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून रस्ता दुरुस्त केला नाही, तर तिन्ही वाड्यांमधील नागरिक, महिला आणि तरुण प्रशासनाविरोधात तीव्र ठिय्या आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
Back to top button