ग्रामीण कष्टातून न्यायसंस्थेपर्यंत उत्तुंग भरारी; कु.अश्वीनी वानखडे यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

– पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी – सातेगाव येथील कु.अश्वीनी रंजीतराव वानखडे हिची मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण पार्श्वभूमीतून शिक्षण घेत चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रबळ जिद्दीच्या बळावर तिने हे उल्लेखनीय यश संपादन केल्याने परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बुद्धवन येथे बोधीसत्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात कु. अश्वीनी हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आठवले होते. यावेळी ट्रस्टचे सचिव भानुदास वानखडे यांनी अश्वीनी हिच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी डिगांबर वानखडे, विजय वानखडे, विनायक वानखडे, अशोकराव वानखडे यांच्यासह मलकापूर येथील सुकेशनी महिला संघ व सातेगाव येथील महामाया महिला संघाच्या सदस्यांची तसेच परिसरातील अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील एका होतकरू युवतीने देशातील सर्वोच्च न्यायसंस्थांपैकी एका संस्थेत स्थान मिळवणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कु.अश्वीनी वानखडे हिच्या यशामुळे परिसरातील युवक-युवतींमध्ये स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवेकडे नव्या आशेने पाहण्याची सकारात्मक भावना निर्माण होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.



