
पत्रकारांवर धडक–दमदाटी, मुख्यमंत्री साहेब पत्रकारांचे प्राण सुरक्षित कधी?
महानंदा मल्टीस्टेट च्या मॅनेजरची भर दिवसा माजलगाव मध्ये पत्रकारावर दादागिरी
लेकरांनाही जीवे मारले जात आहे – पत्रकारांवरील हल्ले थांबतील का?
सुहास सावंत / माजलगाव
माजलगाव शहरात पुन्हा एकदा पत्रकारांवर हल्ल्याचा प्रकार घडल्याने पत्रकार समाजात भीतीचे वातावरण आहे. नरवडे कॉम्प्लेक्सशेजारी पत्रकार सुहास सावंत हे रस्त्याने जात असताना महानंदा मल्टीस्टेट बँकेचा मॅनेजर पाठीमागून वनसाईट गाडीने धडक देत आला. एवढ्यावरच तो न थांबता उलट पत्रकारांनाच दमदाटी करत फोनवर गुंड बोलावण्याचा प्रयत्न करू लागला.
घटनास्थळी आलेल्या नागरिकांनी तातडीने पत्रकारांना बाजूला करून वाचवले. चूक स्वतःची असल्याचे उघड झाल्यानंतर सदर मॅनेजर तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार दिवसा ढवळ्या झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात पत्रकाराच्या मुलांना चाकूने भोसकून जीवे मारण्यात आले होते. आता माजलगावात अशा धमक्या दिल्या जात असल्याने पत्रकार आणि त्यांच्या लेकरांवरच जीवघेणा टार्गेट सुरू असल्याचे चित्र आहे. पत्रकार सत्य लिहीतात म्हणून त्यांच्या कुटुंबालाच मारले जाते, हे धक्कादायक वास्तव महाराष्ट्रात समोर आले आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची अशी अवस्था झाली तर सामान्य नागरिक कसा सुरक्षित राहणार? पत्रकारांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्यासाठी गुंडांना पाठीशी घालण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.
पत्रकार समाजाचा सवाल सरळसरळ मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आहे – हे हल्ले थांबवणार की नाही? पत्रकारांचे प्राण आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. फक्त आश्वासनं नकोत, तर ठोस कारवाई हवी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पत्रकार सत्य मांडण्यासाठी उभा आहे, पण त्याला जिवंत राहण्यासाठी देखील आता लढा द्यावा लागत आहे – ही लोकशाहीसाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरत आहे.



