बीड

कोर्टाच्या निकालालाही केराची टोपली शेतातून जबरदस्तीने रस्ता पाडत कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी; धोंडराईतील शेतकरी कुटुंब भयभीत

कोर्टाच्या निकालालाही केराची टोपली शेतातून जबरदस्तीने रस्ता पाडत कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी; धोंडराईतील शेतकरी कुटुंब भयभीत
गेवराई  | वार्ताहरगेवराई तालुक्यातील धोंडराई येथे जमीन व रस्त्याच्या वादातून गंभीर प्रकार समोर आला असून, एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातून जबरदस्तीने रस्ता पाडत ट्रॅक्टर घालण्यात आल्याचा तसेच कुऱ्हाड घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय व संरक्षणाची मागणी केली आहे.
धोंडराई येथील रहिवासी दिलीप पि. वसंतराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकी व ताब्यात असलेल्या सर्व्हे क्रमांक 259 मधील सुमारे 3 हेक्टर 70 आर जमिनीत कोणताही अधिकृत रस्ता नसताना, दिनांक 14 मे रोजी दुपारच्या सुमारास जबरदस्तीने ट्रॅक्टर घालून रस्ता पाडण्यात आला. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एमएच-29 बीसी 2284 घेऊन आलेल्या दिपक आसाराम निकम यांनी शेतातील बांध फोडत उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्ग काढल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, “हा रस्ता का पाडत आहात?” असा जाब विचारताच हातात कुऱ्हाड घेऊन अंगावर धावून येत “याच रस्त्याने जाईल, अडवले तर जीवनातून संपवू,” अशी उघड धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने यापूर्वीच संबंधित सर्व्हे क्रमांक 259 मधून रस्ता काढू नये, असा निकाल दिलेला असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे. मात्र न्यायालयीन आदेश असतानाही दिपक आसाराम निकम, सुवर्णा दिपक निकम, शंतनू दिपक निकम, समर्थ दिपक निकम व गोवर्धन आसाराम निकम हे संगनमत करून सातत्याने त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, गेल्या जवळपास दहा वर्षांपासून संबंधितांकडून जमीन वहिती करण्यास अडथळे निर्माण केले जात असून, कुटुंबावर दबाव टाकून जमीन विकण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही म्हटले आहे. तसेच “वरील लोकांकडून कधीही अनुचित प्रकार घडू शकतो,” अशी भीती व्यक्त करत पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील जमीन-विवाद, शेतरस्ते आणि न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाचा निकाल असतानाही जर शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीत सुरक्षितता मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, तसेच तक्रारदार कुटुंबाला संरक्षण मिळणार का, याकडे आता धोंडराईसह संपूर्ण गेवराई तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Back to top button