२९ ऑगस्ट मुंबई आंदोलनाच्या निमित्ताने लिंबागणेश येथे चावडीवरील बैठक संपन्न– डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश (दि. ०८) – संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी — मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, कुणबी–मराठा समानतेची घोषणा, ५८ लाख नोंदींची त्वरित अंमलबजावणी, ओबीसी प्रमाणपत्र देण्याची सुलभ प्रक्रिया, आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे, तसेच कायमस्वरूपी आणि कायदेशीर आरक्षणाची हमी — या मागण्यांसाठी दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठकांचे आयोजन सुरू असून, काल दि. ०७ गुरुवारी रात्री बीड तालुक्यातील लिंबागणेश व सोमनाथवाडी येथे चावडीवरील बैठका पार पडल्या.
या बैठकीत बीडहून आलेले मराठा सेवक युवराज मस्के पाटील, संजय वाघुले, नाना पवार, अमोल बागलाने, संजय गोडसे यांनी आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट करत सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. गणेश ढवळे यांनी केले. बैठकीस गावचे सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, विक्रांत वाणी, अशोकराजे वाणी, अक्षय वाणी, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, दिनेश जाधव, दत्ता झोडगे, महावीर वाणी, लक्ष्मण आबदार, प्रकाश वायभट, अजय घोलप, बंडु बागल आदी मान्यवर उपस्थित होते.



