एकल विधवा महिलांना सन्मानाने वागवणे ही समाजाची जबाबदारी : उमाताई जाधव

एकल विधवा महिलांना सन्मानाने वागवणे ही समाजाची जबाबदारी : उमाताई जाधव
ग्रामीण विकास केंद्रातर्फे मकर संक्रांतीनिमित्त मिलिंद नगर येथे तिळगुळ व ब्लँकेट वाटप
जामखेड | प्रतिनिधी :
ग्रामीण विकास केंद्र, जामखेड ,मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ६(मिलिंद नगर) मध्ये तिळगुळ वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.या उपक्रमांतर्गत ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव यांनी घरोघरी भेट देत महिला भगिनींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत तिळगुळाचे वाटप केले. तसेच सणाच्या निमित्ताने मायेची ऊब निर्माण व्हावी, या उद्देशाने वाण म्हणून ब्लँकेट देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना उमाताई जाधव म्हणाल्या,एकल विधवा महिलांना समतेने वागवणे यासाठी मकर संक्रांतीसारखा सण आपुलकी, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा आहे. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक घरापर्यंत पोहोचून महिलांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याची संधी मिळाली, हे समाधानकारक आहे. तिळगुळासोबत मायेची ऊब देणारे ब्लँकेट देताना माणुसकीचा जिव्हाळा जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. पुढील काळातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत राहू.
यावेळी नगरसेविका संगिता भालेराव, ग्रामीण विकास केंद्राच्या सह समन्वयिका रेश्मा बागवान,ललिता पवार,पूजा जाधव आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.विशेष सहकार्य समन्वयक सचिन भिंगारदिवे, संतोष चव्हाण, ऋषिकेश गायकवाड आदींनी केले.
या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.



