कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन
आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्याणानंतर राजकीय पुढाऱ्यांसोबत सेलिब्रिटींनी सुद्धा शेतकर्यांचे आभार मानले आहेत.
अभिनेता सोनू सूदनं या निर्णयासाठी पंतप्रधानांचे आभार मानले. ‘ही उत्तम बातमी आहे. धन्यवाद नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान कार्यालय. शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. गुरुनानक जयंतीच्या दिवशी तुम्ही आनंदानं घरी परताल अशी आशा करतो,’ असं सोनूनं ट्विटमध्ये म्हटलं.
अभिनेत्री तापसी पन्नूनंदेखील या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. गुरुपुरब दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा असं म्हणत तिनं तीन कायदे रद्द करण्यात आल्याची बातमी शेअर केली. अभिनेत्री सयानी गुप्तानंदेखील शेतकऱ्यांचे कौतुक करत आभार मानले. ‘शेतकऱ्यांचं अभिनंदन. तुम्ही हे शक्य करून दाखवलंत. आंदोलन कामी आलं. ज्या शेतकऱ्यांनी जीव गमावला, त्यांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. देव आपला अन्नदात्यासोबत सदैव राहो. जय जवान, जय किसान!’, अशा भावना सयानीनं ट्विटमधून व्यक्त केल्या.