ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुंबईत निर्बंध लागू?
मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर देखील ०.०२ टक्के एवढा आहे. कोविड प्रतिबंधक लसींचा पहिला डोस शंभर टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर ७५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, कोविडचा नवीन प्रकार ओमायक्रॉन या विषाणूचे आव्हान आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, हाच नियम आता सर्वत्रच लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मॉल, दुकान अथवा कार्यालयातदेखील लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. आतापर्यंत १,६५,९८,९९६ इतक्या लोकांनी लसीचा डोस घेतला आहे. तर पहिला डोस घेतलेले ९६,०६,४३१ तसेचदोन्ही डोस घेतलेले ६९,९२,५६५ संख्या आहे.
सध्या दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसमध्ये प्रवेश देण्याचा नियम करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रम मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे. बेस्ट बसमधून दररोज २८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत प्रत्येक बस प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रत्येकाचे प्रमाणपत्र तपासणे बस वाहकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे.