बीड

सीसीआय कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा

सीसीआय कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा
*शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
==================
बीड, प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडथळा, अडवणूक किंवा पिळवणूक होऊ नये, यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देत निवेदन सुपूर्द केले. सध्या बीड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सीसीआयची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही खरेदी केंद्रांहून शेतकऱ्यांकडून अनावश्यक विलंब, लांब प्रतीक्षा, गुणवत्तेच्या कारणावरून अनुचित कपात, ऑनलाइन नोंदणी आणि स्लॉट बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, तसेच या कारणावर खरेदी नाकारल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. खरेदी प्रक्रियेत अन्याय किंवा अडथळे निर्माण होत असतील, तर ते तातडीने दूर केले पाहिजेत, असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी निवेदनात नमूद केले.
निवेदनात अनिलदादा जगताप यांनी खरेदी प्रक्रिया पारदर्शक व शेतकरी-हितकारक करण्यासाठी काही प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या आहेत
सर्व सीसीआय केंद्रांवर देखरेख वाढवून शेतकऱ्यांना अनावश्यक अडवणूक रोखावी, गुणवत्तेनुसार दर कपात केल्यास त्याची कारणमीमांसा लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना द्यावी, ऑनलाइन नोंदणी, स्लॉट बुकिंग, तोलमापन व बिलिंग प्रक्रियेत “तांत्रिक कारणे” दाखवत होणारा त्रास तातडीने थांबवावा, शेतकऱ्यांसाठी शेड, पिण्याचे पाणी, बसण्याची सोय, स्वतंत्र रांगा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. दैनंदिन खरेदीचे निरीक्षण अहवाल जिल्हास्तरावर पुनरावलोकनासाठी सादर करावेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाहीसाठी विशेष पथक नियुक्त करावे. या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवावी, अशी मागणी या निवेदनातून पुढे आली आहे.
Back to top button