नित्य काकड आरतीचा उत्साहात भावपूर्ण समारोप

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी शहरातील गणेश नगर येथील श्री.संकटमोचन हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात झालेल्या गेल्या एक महिन्यापासून पहाटे सुरू असलेल्या नित्य काकड आरतीचा समारोप कार्तीक देवउठनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. यादिवशी सकाळी लवकर झालेल्या काकड आरतीने तसेच प्रभात फेरीने वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेले होते.
मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने व रांगोळीने सजविण्यात आला होता. मृदंग, टाळांच्या गजरात दीपप्रज्वलन, भजन-कीर्तन आणि हनुमान चालीसा पठणामुळे संपूर्ण परिसर मंगलमय झाला. “जय श्रीराम” आणि “पवनसुत हनुमानजी की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले.
स्थानिक महिला मंडळे, युवक मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. आरतीनंतर महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी भक्तांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. त्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी सायंकाळी अचलपूर येथील कार्तीक स्वामी मंदिरात जाऊन भक्तीभावाने दर्शन घेतले. या धार्मिक कार्यक्रमामुळे गणेश नगर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा संदेश पसरला.
याप्रसंगी श्री ज्ञानदेवजी पारे, श्री विजयभाऊ गुहे, श्री राजूभाऊ इसाने, श्री गजाननभाऊ मुधोळकर, श्री आशिषभाऊ चोपडे, श्री अंकुशभाऊ गुहे, श्री अरुणभाऊ काळे, श्री गोपालभाऊ पारे, श्री पवनभाऊ गावंडे, श्री ऋषिकेशभाऊ राऊत, श्री जितूभाऊ गावंडे, श्री एकनाथभाऊ पंचवटे, आयुष पारे, हर्षल राऊत, अथर्व चोपडे, देवेश तळोकार, अर्णव चौखंडे, श्रीरंग वाघमारे, कृष्णा चांदुरकर व परिसरातील समस्त नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

