
कृषी अधिक्षकांना सोबत घेवून शिवसेना जिल्हा संघटक विक्रमराजे भोसले यांनी बांधावर जाऊन केली पहाणी
कापूस व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कृषी अधिक्षकांना सूचना
बीड (प्रतिनिधी): दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गेवराई तालुक्यातील शेतकर्यांच्या कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत अप्पा नवले यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा शिवसेना संघटक विक्रमराजे भोसले यांनी कृषी विभागाच्या अधिकार्यांसमवेत शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
यावेळी कृषी अधीक्षक साळवे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी तसेच सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते. पावसाअभावी व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कापूस तसेच इतर पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून अनेक शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना विक्रमराजे भोसले यांनी कृषी विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
शेतकर्यांच्या बांधावरच जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद घेण्यात यावी, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या मदतीसाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना विक्रमराजे भोसले म्हणाले की, गेवराई तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकर्यांच्या अडचणींची संपूर्ण माहिती घेऊन बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत आप्पा नवले शिवसेना नेते गणेशराव पवार यांच्यासह बीड जिल्हा शिवसेना शिष्टमंडळ घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आहे. शेतकर्यांना या संकटातून दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर काहीतरी ठोस मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा मिळणे गरजेचे असून प्रशासनाने शेतकर्यांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी भूमिका शिवसेना जिल्हा संघटक विक्रमराजे भोसले यांनी यावेळी मांडली. कृषी विभागाच्या अधिकार्यांनीही नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.



