संपादकीय

“२६/११ हल्ल्याच्या वेळी राहुल गांधी नाच-गाणं करत होते”

 

नवी दिल्ली | पुन्हा एकदा २६|११ च्या हल्ल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु झाले असून आरोप-प्रत्यारोपला सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचे नवीन पुस्तक ’10 Flash Points; 20 Years – National Security Situations that Impacted India’ यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर मुंबईतील २६/११ च्या घटनेवरुन निशाणा साधला आहे. तसेच भाजपनेही काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर त्याच 26/11 च्या हल्ल्यावरुन टीका केली आहे. याला काँग्रेसच्या अपयशाची कबुली म्हणणे योग्य ठरेल, असे मत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भाटिया पत्रकार परिषदेत म्हणाले, प्रत्येक भारतीयाप्रमाणे आम्हालाही खूप वेदना होत होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर भारताच्या अखंडतेची चिंता नव्हती. सोनिया-राहुल त्यांचे मौन तोडणार का? सोनिया गांधींना प्रश्न आहे की त्यांनी भारतीय सैन्याला खुले स्वातंत्र्य आणि परवानगी का दिली नाही? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणे देशासाठी महत्त्वाचे असल्याने भाजप हा प्रश्न उपस्थित करत आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने शहीदांच्या हौतात्म्याची खिल्ली उडवली. सोनिया गांधी तुम्हाला सांगावे लागेल की, लष्कराला तेव्हा परवानगी का दिली नाही ? आमच्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का? जेव्हा आपल्या देशावर हल्ला होत होता, तेव्हा राहुल गांधी सकाळपर्यंत नाच-गाणं करत होते, अशी बातमी एका वर्तमानपत्रात आली होती.

काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, इम्रान खान आमचे मोठे भाऊ आहेत. देश राहुल गांधींना विचारतोय की आमच्या पोलीस आणि कमांडोंनी दिलेल्या हौतात्म्याचा बदला पाकिस्तानकडून घेण्यात तुम्हाला यश का आले नाही ? पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. उरीमध्ये पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चपराक दिली होती, हे लक्षात ठेवा.

Back to top button