📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफीचे मनापासून स्वागत आणि आदर करतो; पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान सांडपाणी आल्याबद्दल माफी कधी?*..प्रा.सनी विष्णु वाघमारे 

*महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफीचे मनापासून स्वागत आणि आदर करतो; पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान सांडपाणी आल्याबद्दल माफी कधी?*..प्रा.सनी विष्णु वाघमारे

बीड | प्रतिनिधी
बीड नगरपरिषदेच्या स्वच्छता सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांच्या या माफीचा आम्ही मनापासून आदर करतो आणि स्वागत करतो. चूक लक्षात आल्यानंतर माफी मागणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.मात्र, या माफीच्या निमित्ताने काही सरळ, स्पष्ट आणि अस्वस्थ करणारे प्रश्न जनतेसमोर ठेवणे आवश्यक आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.
नगराध्यक्षांचा *भीम कन्या* असा उल्लेख करायचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करायचा आणि बाबासाहेबांचे नाव अभिमानाने घ्यायचे मग १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान मिरवणुकीच्या मार्गावर सांडपाणी/नाल्याचे पाणी आल्याने नागरिक, महिला आणि मिरवणुकीतील सहभागी नागरिकांना त्यातून मार्ग काढावा लागला त्या वेळी हीच संवेदनशीलता कुठे होती?
स्वच्छता विभागाची जबाबदारी असलेल्या सभापतींच्या कार्यकाळात बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीच्या मार्गावर अशी परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब आहे.आज महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितली जाते आणि आम्ही त्या माफीचे स्वागत करतो.पण आमचा थेट सवाल आहे.ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करता, त्यांच्याच जयंतीच्या दिवशी त्यांच्या अनुयायांना आणि शहरातील नागरिकांना सांडपाण्यातून जावे लागले; त्या प्रकरणी माफी मागण्याची नैतिक जबाबदारी कुणाची? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख चुकीचा आहे आणि त्याबद्दल माफी मागणे योग्य आहे.मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या अनुयायांना आणि नागरिकांना अस्वच्छतेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले तर त्यांच्या भावना दुखावत नाहीत का?महापुरुषांच्या सन्मानाबाबत दुहेरी मापदंड चालणार नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर—दोघांचाही सन्मान हा केवळ भाषणातून, घोषणांतून किंवा सोशल मीडियावरील पोस्टमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे.आम्ही कोणत्याही महापुरुषांच्या अवमानाचे समर्थन करत नाही. उलट, प्रत्येक महापुरुषाच्या सन्मानासाठी समान संवेदनशीलता असली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.म्हणून आमचा विरोध कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक विरोधासाठी नसून दुहेरी मापदंडांच्या विरोधात आहे.महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितल्याबद्दल आम्ही स्वच्छता सभापतींचा आदर करतो आणि त्यांच्या माफीचे स्वागत करतो.आता १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना झालेल्या त्रासाची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वच्छता सभापतींनी आणि संबंधित प्रशासनानेही माफी मागावी, ही आमची स्पष्ट मागणी आहे.कारण—महापुरुषांच्या नावाचा पुरस्कार करणे सोपे आहे; पण त्यांच्या विचारांप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या सन्मानाची आणि मूलभूत हक्कांची जबाबदारी स्वीकारणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन आहे.
महाराजांचा सन्मान झाला पाहिजेच!
बाबासाहेबांचा सन्मान झाला पाहिजेच!
पण सर्वसामान्य नागरिकांचाही सन्मान झाला पाहिजे!
जय शिवराय!
जय भीम!
Back to top button