समाजसेवेचा गौरव; गौतम कांबळे “पद्मपाणि” पुरस्काराने सन्मानित

बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणारे समाजसेवक गौतम कांबळे यांना प्रतिष्ठेच्या “पद्मपाणि” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्यास मिळालेला हा सन्मान असल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गौतम कांबळे यांनी अनेक वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून दिले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील गरजू लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सदैव पुढाकार घेतात. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेकांना आधार दिला आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागापासून शहरातील झोपडपट्ट्यांपर्यंत अन्नधान्य, किराणा साहित्य व अत्यावश्यक वस्तू पोहोचवून अनेक कुटुंबांना दिलासा दिला. संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना आजही लोकांच्या स्मरणात आहे.
सामाजिक चळवळींसोबतच सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करण्याचे काम ते सातत्याने करतात. समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कासाठी ते नेहमीच आवाज उठवत असतात.
त्यांच्या याच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत “पद्मपाणि” संस्थेकडून त्यांना बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक १७ मे २०२६ रविवार रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या समाजसेवेची पावती असून, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून यापुढेही त्यांच्या हातून समाजासाठी असेच उत्कृष्ट कार्य सदैव सुरू राहावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत



