चलो मुंबई आंदोलनासाठी लिंबागणेश पंचक्रोशी सज्ज :- डॉ.गणेश ढवळे

—-
लिंबागणेश : (दि.२६)मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याची अंमलबजावणी, हैद्राबाद–सातारा–मुंबई गॅझेट लागू करणे, सरसकट गुन्हे मागे घेणे आणि कायद्यात बसणारे आरक्षण देणे या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनासाठी लिंबागणेश पंचक्रोशी सज्ज झाली आहे.
बालाघाटावरील मराठा सेवकांनी गावोगावी जनजागृती मोहीम राबवून चावडी बैठका, गाठीभेटी घेऊन समाजबांधवांना एकवटले आहे. मुंबई आंदोलनासाठी वाहनव्यवस्था, खाद्यपदार्थ, बॅनर, झेंडे, वेशभूषा आदींची जय्यत तयारी करण्यात आली असून तरुणाईसह महिला, वयोवृद्ध यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
या तयारीत कल्याण वाणी, मुरलीधर जाधव, रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मोरे, रमेश पाटील, भगवान मोरे, विक्रम दाभाडे, पांडुरंग वाणी, महावीर जाधव, अशोक वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, मोहन कोटुळे, राजेंद्र ढास, सतिश वायभट, संजय पावले, रामचंद्र मुळे, आश्रुबा गिरे, अकबर सय्यद आदी कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.
—
५८ लाख कुणबी नोंदींचा लाभ – सकळ मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी : डॉ.गणेश ढवळे
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे म्हणून मागील ४० वर्षांचा संघर्ष अखेर फलदायी ठरत असून आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी मिळाल्याने समाजाला मोठा फायदा झाला आहे. भविष्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कायमस्वरूपी आरक्षण मिळेल, या ठाम विश्वासाने मराठा समाज एकदिलाने मुंबई आंदोलनात सहभागी होणार असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले.



