बीड

जामखेड शहरातील विद्युत सुरक्षेसाठी ; आदर्श फाऊंडेशचा पुढाकार

जामखेड शहरातील विद्युत सुरक्षेसाठी ; आदर्श फाऊंडेशचा पुढाकार

महावितरणला आकाश बाफनांचा १ महिन्याचा अल्टीमेटम

जामखेड प्रतिनिधी –जामखेड शहरात अनेक ठिकाणी ११ केव्ही आणि ३३ केव्ही विद्युत वाहिन्या उघड्या अवस्थेत असून, यामुळे मागील काही वर्षांत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कालच १२ वर्षीय मुलगा विजेच्या धक्याने दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. या पार्श्वभूमीवर आज आदर्श फाऊंडेशनच्या वतीने महावितरणच्या कार्यालयात मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत जबाबदारीची जाणीव करून दिली.यावेळी आदर्श फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा युवा नेते आकाश बाफना,दत्तात्रय जगताप, अख्तर शेख, शिव बालक आदी उपस्थित होते.

यावेळी आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा युवा नेते आकाश बाफना यांनी सांगितले की,शहरात जेवढ्यापण ३३/११ केव्ही लाईन्स असतील सुरक्षित अशा लाईनला रबरी केबल टाकून सुरक्षित करावे.जेणेकरुन जामखेड शहरात यापुढील काळात कोणत्याही नागरिकांचा निष्पाप बळी जाणार नाही व कोणतीही घटना घडणार नाही. नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून महावितरणने तात्काळ उपाययोजना करावी. एक महिन्याची मुदत दिली असून काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या निवेदनात जामखेड शहरातील सर्व उघड्या लाईन्सना रबरी पीव्हीसी पाईप सहाय्याने त्वरित सुरक्षित करावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी महावितरणला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत उपाययोजना न झाल्यास संपूर्ण जामखेडकरांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button