बीड
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरी गेलाच नाही, विरोधकांनी अफवा पसरवने बंद करावे – अनिलदादा जगताप

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरी गेलाच नाही, विरोधकांनी अफवा पसरवने बंद करावे – अनिलदादा जगताप
बीड, प्रतिनिधी- बीड जिल्हा दौऱ्यावर असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरी गेल्याच्या बातम्या शनिवारी दिवसभर सर्व टीव्ही चॅनलवर, पोर्टलवर सुरु होत्या. मंत्र्यांच्या मोबाईल चोरीच्या बातमीने राज्यभर खळबळ उडवून दिली. मंत्र्यांचाच मोबाईल सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न देखील नेत्यांमधून उपस्थित होऊ लागला होता. या सर्व प्रकारानंतर शनिवारी रात्री उशिरा बीड पोलीस अधीक्षकांनी मोबाईल फोन विसरला होता नंतर तो कोणीतरी आणून दिला असे स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र विरोधक आऊचा बाऊ करून सोशल मीडियावर अफवांचे वावडळ आणत आहेत. याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी पत्रक कढून सविस्तर माहिती दिली आहे की, विविध समाज माध्यमांवर व विविध न्यूज पोर्टलवर मा. योगेश कदम, राज्यमंत्री (गृह) महाराष्ट्र राज्य हे मस्साजोग ता. केज येथे आलेले असतांना त्यांचा मोबाईल गहाळ/चोरी गेल्याची बातमी प्रसारित झाली. परंतु सदर बाबत सत्यता अशी आहे की, मा. मंत्री महोदय हे मस्साजोग येथे धनंजय देशमुख व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धनंजय देशमुख यांच्या शेजारी बसलेले होते. पत्रकारांशी संवाद साधताना मोबाईल खाली ठेवला होता त्यानंतर ते बांधकाम सुरू असलेले घराची पाहणी करण्यासाठी चालत गेले. घराची पाहणी करत असताना त्यांनी पीएंकडे मोबाईल मागीतला त्यावेळी पीएंनी माझ्याकडे मोबाईल नाही असे सांगीतले. त्यावेळी मंत्री महोदय यांनी मोबाईल शोधा असे म्हटले. हे वाक्य उपस्थित लोकांपैकी कुणीतरी ऐकून बाहेर वाच्यता केली. परंतु मंत्री महोदय व मी स्वतः जाण्यासाठी गाडीत बसलो असता कोणीतरी मोबाईल आणून माझ्याकडे दिला व तो मोबाईल मी स्वतः मंत्री महोदय योगेश कदम यांच्याकडे दिला. मंत्री महोदयांना त्यांचा मोबाईल मिळाला आहे, हे बाहेर माहीत नसल्यामुळे या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या चालल्या आहेत. मंत्री महोदय यांचा मोबाईल चोरी झालेला नाही. कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब हे देशमुख कुटुंबीयांना मदतीचा एक हात म्हणून स्वतःच्या हक्काचे घर बांधून देत आहेत. देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तसेच त्यांना बांधून देत असलेल्या घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी वारंवार शिवसेनेचे विविध नेते, मंत्री मस्साजोग येथे येऊन भेट देत आहेत. घडलेली घटना अत्यंत साधारण होती. मात्र विरोधकांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेल्याच्या अफवांचे वावडळ आणले असून सोशल मीडियावर बीडची बदनामी करणे सुरु केले आहे. विरोधकांनी अफवा पसरवने बंद करावे आणि बीडची बदनामी थांबवावी असे आवाहन शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी प्रसार माध्यमांमध्ये पत्रक जाहीर करून केले आहे.
°°°°°



