बीड
कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वापराची तसेच बिबट्या प्रश्नावर उपाययोजनांची आमदार सुरेश आण्णा धस यांची मागणी

कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वापराची तसेच बिबट्या प्रश्नावर उपाययोजनांची आमदार सुरेश आण्णा धस यांची मागणी
आष्टी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान सभागृहात बोलताना सुरेश आण्णा धस यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची मागणी केली. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेती अधिक शाश्वत बनवणे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत सक्षम करण्यासाठी “AI for Agri 2026” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामान अंदाजावर आधारित पेरणी सल्ला, कीड-रोग ओळख, माती परीक्षणावर आधारित खत शिफारस, स्मार्ट सिंचन प्रणाली तसेच बाजारभावाचा अंदाज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल, असे त्यांनी सांगितले.तसेच यावेळी प्रत्येक तालुक्यात AI आधारित कृषी मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे.शेतकऱ्यांना अनुदानित माती सेन्सर व स्मार्ट सिंचन प्रणाली उपलब्ध करून द्याव्यात.
कृषी विद्यापीठांमध्ये AI संशोधनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावेत.ग्रामीण भागात मजबूत इंटरनेट सुविधा उपलब्ध करावी.
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना AI विषयक प्रशिक्षण द्यावे.दरम्यान, आमदार धस यांनी पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या बिबट्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात बिबट्यांच्या हालचाली वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
खेड-मंचर येथील रेस्क्यू सेंटरचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी
गावपातळीवर बिबट्याबाबत जनजागृती मोहीम राबवावी.
एलईडी स्क्रीनद्वारे सूचना व माहिती उपलब्ध करून द्यावी.
संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.बिबट्यांच्या हालचालीबाबत इशारा देणारी यंत्रणा उपलब्ध करावी.तसेच बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या शासन निर्णयात स्पष्टता आणून बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणीही त्यांनी केली.शेती ही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे आमदार सुरेश धस यांनी अधोरेखित केले.



