बीड

एनएसएल शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या कथित प्रदूषणाची चौकशी सुरू

एनएसएल शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या कथित प्रदूषणाची चौकशी सुरू
*सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांच्या स्मरणपत्राची प्रशासनाने घेतली दखल*
माजलगांव (प्रतिनिधी) :  माजलगांव तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर कारखान्यामुळे परिसरात होत असलेल्या कथित प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील उपप्रादेशिक अधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांनी दिलेल्या स्मरणपत्राची प्रशासनाने दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, पिण्याचे पाणी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सविस्तर स्मरणपत्र सादर करून तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत उपप्रादेशिक अधिकारी (जालना) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने कारखाना परिसराला भेट दिली. यावेळी पथकाने कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे तसेच परिसरातील विविध ठिकाणांवरील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. यासोबतच प्रदूषण तपासणी वॅनही कारखाना परिसरात दाखल करण्यात आली असून प्राथमिक तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नमुने प्रयोगशाळेत तपासल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे पुढील आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Back to top button