“ममता बॅनर्जी आल्या आणि महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या”
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सध्या देशभर राजकीय दौरे करत आहेत. ममता बॅनर्जी राष्ट्रीय स्तरावर भाजपला विरोध करण्यासाठी विविध समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा विचार करत आहेत.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यावरून सध्या राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान युपीएबाबत वक्तव्य केलं होतं. यावरून काॅंग्रेस आणि टीएमसीमध्ये चांगलीच जुंपली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना पत्रकार परिषदेत युपीएबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सध्या युपीए नाही, असं वक्तव्य केलं होतं.
ममता बॅनर्जी यांच्या आणि काॅंग्रेसच्या वादात आता सत्ताधारी शिवसेनेनं उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी प्रकरणात भाजपची भूमिका टोकाची आहे. ममता बॅनर्जी आल्या आणि महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसेच भाजपचा राष्ट्रीय स्तरावर मुकाबला करायचा असेल तर काॅंग्रेसशिवाय पर्याय नाही, असंही शिवसेनंनं म्हटलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काॅंग्रेसचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. परिणामी महाराष्ट्रात ज्या प्रकारं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. अगदी तसाच प्रयोग राष्ट्रीय स्तरावर होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.