मुख्यमंत्री साहेब कधीतरी भटक्यांच्या पालापर्यंत लक्ष द्या … फिरस्ता- प्रा.संतोष चव्हाण

मुख्यमंत्री साहेब कधीतरी भटक्यांच्या पालापर्यंत लक्ष द्या …
फिरस्ता- प्रा.संतोष चव्हाण
गाव कोसाच्या बाहेरील तीन दगडाची भटक्याची चूल
जामखेड प्रतिनिधी:-भटक्या समाजामध्ये एकूण 42 जाती आहेत त्यापैकी नाथपंथी डवरी गोसावी ही जात ,सतत कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये बहुरूपी पोलीस इन्स्पेक्टर, डॉक्टर, वकील, तंट्या भिल्ल असे वेगवेगळी सोंग घेवून कला सादर करून कुटुंबाची उपजीविका करत असतात .आज पर्यंत या भटक्याच्या पालावरती स्वातंत्र्याची पहाट झाली नाही.
राहण्यासाठी स्वतःची जागा नाही ,तिरंगा झेंडा लावण्यासाठी घर नाही, कसून खाण्यासाठी जमीन नाही, व्यवसाय करण्यासाठी शासन व बँका कर्ज देत नाही, नागरिकत्वाचे पुरावे आधार कार्ड ,मतदान कार्ड, जॉब कार्ड, जातीचा दाखला नसल्यामुळे शासनाची कुठलीच कल्याणकारी योजना मिळत नाही.पोटासाठी सतत भटकंती करावी लागते त्यामुळे सरकार दरबारी नोंद नाही.
या देशात जन्म घेऊन आमचा काय गुन्हा ? आजही गावाच्या बाहेर पाल ठोकले तर पोलीस स्टेशन पोलीस पाटील यांना मुला बाळासह प्राण्यासह मशापुरी द्यावी लागते या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भटके विमुक्त समाज रक्ताच्या थारोळ्यात होता.
आजही या समाजाचा, काय विचार केला जातो, पिढी न पिढी बरबादी झाली पण अजून या समाजाला आझादी मिळाली नाही.
भिक्षा मागून आणलेले शिळे भाकरीचे तुकडे, भाजी, चटणी, धान्य, फाटके तुटके कपडे, उघड्यावर राहणे बाराही महिने वेगवेगळ्या गावातले पाणी पिणे आजारी पडले तर अंगावर आजार काढणे खरंच या भटक्याच्या वेदनेला बघून जगावे की, मरावे असे मनाला वाटू लागले उन्हाळ्याच्या झळा पेक्षा मनाला लागलेली गरिबीची झळ विस्तावासारखी आहे.
मुख्यमंत्री साहेब कधीतरी भटक्यांच्या पालापर्यंत आपले लक्ष जाऊ द्या आज महाराष्ट्रातील कितीतरी महिला तुमच्या लाडक्या बहिणी आहेत परंतु तुमची लाडकी बहीण होण्याची भटक्याच्या पालातील महिलांना संधी मिळू द्या नागरिकत्वाचे पुरावे नसल्यामुळे लाडक्या भावा वाचून पालातील लाडकी भटक्याची बहीण अजूनही वंचित राहिलेले आहे. आजारी पडले तर महात्मा फुले आरोग्य योजना लाभ नागरिकत्वाचे पुरावे नसल्यामुळे मिळू शकत नाही पोटासाठी गोदडी,काच, भंगार ,प्लास्टिक गोळा करण्यासाठी गेल्यावर अत्याचार होतात. भेदभाव केला जातो साक्री जिल्हा धुळे राईनपाडा येथे पोट भरण्यासाठी भिक्षा मागताना पोरं चोरून घेऊन जाणाऱ्या टोळी संशयात भटके विमुक्त समाजाची पाच जण अमानुषपणे मारून टाकले. दौंड, यवत जिल्हा पुणे येथे शितल शेगर भंगार वेचताना परप्रांतीयांनी अत्याचार करून तिचे डोळे काढून तिला ठार मारण्यात आले. इंदापूर शिरसवडी जिल्हा पुणे येथे तरुण युवक पोलीस अकॅडमी प्रशिक्षण देत असताना जुन्या वादावरून गावातील गावगुंडांनी गोळ्या घालून ठार मारले. राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे भटके विमुक्त गोसावी समाजातील सुनील मकवाने यांच्या दोन लहान दुर्गा नऊ वर्ष, कार्तिक आठ वर्षे यांच्यावर परप्रांतीयांनी अत्याचार करून मारून टाकले. या भटके मुक्त वंचित समूहाला वाली नसल्यासारखे झाले
निसर्ग साथ देत नाही. सरकार डोळे उघडून बघत नाही, सोशल मीडियावर समाजाच्या वेदना दुखणे मांडण्यासाठी पुढारी तयार होत नाही. सगळीकडून भेदभाव होतो असे वाटते पण सर्वांना मतदानाच्या वेळेस भटके विमुक्त पालातील गोरगरीब वंचित अत्याचार ग्रस्त दिसतात असे का ? भेदभाव म्हणावा की स्वार्थ !



