
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ना बीडला ना आष्टीला.
आष्टी प्रतिनिधी:- शासनाच्याआदेशाला केराची टोपली दाखवत बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ मधील सुमारे ३० अधिकारी कर्मचारी चक्क कार्यालयाला कुलूप लावून गेल्या तीन दिवसांपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. १६ ऑक्टोबर शासन निर्णयान्वे हे कार्यालय आष्टी येथे स्थलांतरित होणार आहे मात्र स्थलांतराच्या नावाखाली सरकारी अधिकारी रजेवर निघून गेले आहेत. हा प्रकार फक्त काम बंद आंदोलन किंवा सामूहिक रजा नसून जनतेला वेठीस धरणाऱ्या गलथान कारभाराचा नमुना असल्याचे मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांचं म्हणणं आहे. रस्त्याच्या दुरुस्ती, पुलांची कामे, कंत्राटदाराची देयके, या अत्यावश्यक विषयासाठी तीन दिवसांपासून बंद दरवाज्यासमोर उभे राहण्याची वेळ आली आहे. मुख्य अभियंता छत्रपती संभाजीनगर व अधिक्षक अभियंता धाराशिव यांच्या नियंत्रणाखाली हे कार्यालय बंद राहणं म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन समर्थन आहे का असा प्रश्न मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केला आहे.
चौकट
कठोर कारवाईची मागणी
या प्रकारामुळे शासकीय यंत्रणेची प्रतिमा मलीन झाली असून संबंधित कर्मचारी यांच्यावर पगार कपातीची कारवाई करावी, तसेच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केली आहे.



