बीड
रखरखत्या उन्हात तप्त लोखंडाला आकार देणा-या घिसाडी समाजाला मात्र स्वतःच्या आयुष्याला आकार देता येत नाही; घण लोखंडावर बरोबरच काळजावर सुद्धा; कथा आणि व्यथा विलास पडुळकर घिसाडी कुटुंबाची :- डॉ.गणेश ढवळे

रखरखत्या उन्हात तप्त लोखंडाला आकार देणा-या घिसाडी समाजाला मात्र स्वतःच्या आयुष्याला आकार देता येत नाही; घण लोखंडावर बरोबरच काळजावर सुद्धा; कथा आणि व्यथा विलास पडुळकर घिसाडी कुटुंबाची :- डॉ.गणेश ढवळे
——
लिंबागणेश:- ( दि.०९) रखरखत्या उन्हात बाहेरचं ऊन आणि भट्टीची उष्णता मिळुन उष्णतेची जबर झळ सोसुन वजनदार घण मारून तप्त लोखंडाला आकार देण्याचे काम करणाऱ्या घिसाडी समाजातील लोकांना स्वतःच्या आयुष्याला मात्र आकार देता येत नाही.
सध्या बीड तालुक्यातील लिंबागणेश या गावी रस्त्याच्या कडेला पिक अप मध्ये अख्खा संसार थाटुन बायको आणि ३ मुलांसह रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची हत्यारे अवजारे बनविणे हा यांचा परंपरागत व्यवसाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भराडी गावचे विलास कैलास पडुळकर, पत्नी रेणुका, शिवाजी,शिवम आणि कोमल नावाची ३ मुलं. पोटापाण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी मुक्काम दर मुक्काम करत पोटाची भुक भागवाण्यासाठी धडपड.
पुरूषांपेक्षा महिलांचे योगदान जास्तीचे
—
ग्रामीण महाराष्ट्रात घिसाडी समाजातील पारंपारिक व्यवसायात पुरूषांपेक्षा जास्तीचे योगदान महिलांचे.त्यासाठी भट्टी लावणे,तप्त लाल लोखंडावर गरजेप्रमाणे ७ ते १५ किलो वजनाचे घण मारणे.,ग्रांईडर मशिन नसल्याने काणसीने हत्यारे घासणे,बनवलेली अवजारे आसपासच्या गावातील आठवडी बाजारात जाऊन विकणे हि कामे प्रामुख्याने महिलाच करतात. शिवाय सगळी घरगुती कामे, मुलांना सांभाळणे हि कामे महिलांनाच करावी लागत असल्याचे रेणुका पडुळकर यांनी सांगितले. सांडपाण्याची व्यवस्था नाही.झोपडीशेजारीच गोलाकार खड्डा करून त्यातच कपडे -भांडी धुण्याचे पाणी, शिवाय मुलाबाळांसाठी आंघोळीसाठी पाणी साठवायचे.शौचालयाची सोय नसल्याने पहाटेच उठून या महिलांना शौचासाठी दुर उघड्यावर जावे लागते.
शिक्षणाचा गंध नाही, विकासापासून कोसो दुर;
—
विलास पडुळकर सांगतात त्यांना ३ मुलं दोन मोठे मुलगे शिवाजी आणि शिवम तर धाकटी मुलगी कोमल. यांच्या सोबतच असतात. परंपरागत हाच पोटापाण्याचा धंदा, शिकुन सवरून कामधंद्याला लागल्याचं त्यांच्या पाहण्यात नसल्याने शिक्षणाचे महत्त्व नसल्याने शिक्षणावाचुन काही अडत नाही.शाळा शिकलेल्यांना शिक्षणाचा फायदा झालाय,नोक-या लागल्यात असं त्यांच्या ऐकण्यात सुद्धा नाही. घिसाडी जमातीचे लोक प्राचीन काळी राजपूत सैन्यात ढाली तलवारी तयार करणारे कारागीर,तलवारींना धार लावण्याचे काम करायचे आणि त्यांच्या सोबत युद्धभूमीवर सोबत रहायचे.महाराणा प्रतापसिंहाचे आम्ही वंशज असल्याचे ते अभिमानाने सांगतात.



