यमगरवाडी जोड रस्त्यासाठी १३७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर – आ. विजयसिंह पंडित

यमगरवाडी जोड रस्त्यासाठी १३७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर – आ. विजयसिंह पंडित
____________________________
आश्वासनपूर्ती मुळे ग्रामस्थांकडून आ. पंडित यांचे आभार
——————————
गेवराई २० मे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे यमगरवाडी जोड रस्त्याच्या डांबरी नूतनीकरण कामासाठी १३७.२९ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यमगरवाडी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती या माध्यमातून झाली असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. या कामाच्या मंजुरीबाबत त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महायुती सरकारचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत तर यमगरवाडी ग्रामस्थांनी आश्वासनपूर्तीबद्दल आ. विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यातील सन २०२६ – २७ मधील महाराष्ट्र राज्यातील कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश १८ मे रोजी निर्गमित झाले. या मध्ये बीड जिल्ह्यातून केवळ प्रजिमा २० ते यमगरवाडी या जोड रस्त्याच्या एकमेव कामाचा समावेश आहे. प्रजिमा २० ते यमगरवाडी या रस्त्याच्या डांबरी नूतनीकरण कामाला १३७.२९ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मौजे यमगरवाडी ग्रामस्थांनी आमदार विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे यमगरवाडी या जोड रस्त्याचे डांबरीकरण आणि रस्त्यावरील पुलांची कामे करून देण्याचे आश्वासन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीमुळे हे आश्वासन पूर्ण होत असल्याचे समाधान होत असुन निवडणूक जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपण नियोजनपूर्वक काम करत असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले.
पुढे बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ग्रामीण भागात दळणवळणाच्या सक्षम सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने काम सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतही गेवराई मतदार संघातील अनेक कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत त्या कामांनाही लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे सांगून ग्रामीण रस्त्यांची कामे अतिशय दर्जेदार करण्यावर आपला भर असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कामास मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती सुमित्रावहिनी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्यासह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महायुती सरकारचे आ. विजयसिंह पंडित यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.



