बीड

महिलांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ? राष्ट्रवादी चे निवेदन

महिलांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ? राष्ट्रवादी चे निवेदन

महिला नेतृत्व असतानाही स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर

जामखेड प्रतिनिधी : स्मार्ट शहराच्या गप्पा, पण महिलांसाठी स्वच्छतागृहांची (वानवा) गैरसोय …एकीकडे शहर विकासाच्या घोषणा आणि स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या जात असतानाच जामखेड शहरात महिलांसाठी मूलभूत सार्वजनिक स्वच्छतागृहांचीच पुरेशी सुविधा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. महिलांना रोजच्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असताना नगर प्रशासन मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका आता होत आहे.

जामखेड नगर परिषदेमध्ये महिला नगराध्यक्ष तसेच १२ महिला नगरसेविका कार्यरत असतानाही महिलांसाठी मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जामखेड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत शहरातील प्रमुख ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर नगरसेवक राजेंद्र गोरे, वसिम सय्यद व इस्माईल सय्यद यांच्या सह्या आहेत.

या निवेदनप्रसंगी जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, प्रकाश काळे, अमोल गिरमे,प्रा.सुनिल जावळे, दादा महाडिक,अशोक घुमरे,बजरंग डूचे, सागर भोसले,अनिल अडाले, सुनिल साळवे, अनिल रेडे,सचिन शिंदे, बिलाल शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या जामखेड शहर व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर महिला विविध कारणांनी दररोज ये-जा करतात. खरेदी, शैक्षणिक कामे, नोकरी, रुग्णालयीन सेवा तसेच अन्य कामांसाठी महिलांची शहरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र महिलांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे शहर स्वच्छतेच्या जाहिराती आणि विकासाच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे महिलांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः महिलांच्या सन्मानाशी निगडित प्रश्नांकडे नगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button