संपादकीय

राज्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकींचे वाजले बिगुल

 

कोरोनाच्या संकटामुळे दीड वर्षे स्थगित केलेल्या राज्यातील तब्बल २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा शुक्रवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा बँका, दूध संघ, साखर कारखान्यासह कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुकाचा धमाका आता राज्यात रंगणार आहे. प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोविड-१९ परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या.

शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवून, या निवडणूका १ सप्टेंबरपासून घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानुसार प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण एकूण ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांचा ६ टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे ४ हजार ३६२ व १२ हजार ७२९ अशा एकूण १७ हजार ९१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत.

आता तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केलेले असून, त्यामध्ये १८ हजार ३१० कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा तर उर्वरित ८ हजार ८२८ सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्था आदींचा समावेश आहे.

प्राधिकरणाने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी १६ बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलढाणा आणि उस्मानाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूका निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. रायगड तसेच जालना या दोन २०२२ या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत.

Back to top button