देशविदेश

‘इथं येऊन त्यांनी गाजर वाटप केलं असेल, मंत्री आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

 

दादरा नगर-हवेलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमने-सामने आले आहेत. त्यातच दोन्ही पक्षांनी दादरा नगर हवेलीत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. दोन्ही पक्षांचे बडे नेते दादरा-नगर हवेलीत प्रचारासाठी येत आहेत. यातच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सिल्वासा येथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी सभा घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली.

दादरा नगर-हवेलीत कालच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवाराचा प्रचार केला होता. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात फडणवीसांवर निशाणा साधला. “काल इथं महाराष्ट्रातून कोणी येऊन गेलं. त्यांनी गाजर वाटप केलं असेल. त्यांनी याआधीही महाराष्ट्रासाठी एवढे कोटी दिले, तेवढे दिले असं सांगत फिरले आहेत. पण आम्ही इथं पक्ष वाढविण्यासाठी आलेलो नाही. आमची न्यायाची लढाई आहे. डेलकर कुटुंब असेल दादरा नगर-हवेली असेल यांच्यासाठी आमची न्यायाची लढाई आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मी कलाबेन आणि अभिनव यांच्याशी बोललो. त्याचीपण हीच भावना आहे. इथं जनतेवर हुकूमशाही सुरू आहे आणि ती मोडून काढायची आहे. शिवसेना नेहमीच हुकूमशाहीविरोधात लढत आली आहे. त्यामुळेच शिवसेना डेलकर कुटुंबीयांसोबत ठामपणे उभी आहे असं त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Back to top button